ईव्हीएममध्येही बिघाड असल्याचा विरोधकांचा आरोप

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानही पार पडले आहे. अशा परिस्थितीत आज पुन्हा एकदा विरोधकांनी ईव्हीएम विरोधात आवाज उठवला आहे. विरोधी पक्षांनी ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे व्हीव्हीपॅट मशीनमधून चुकीच्या पावत्या निघत आहेत. विरोधी पक्षांनी आता हाच मुद्दा घेऊन आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

दिल्लीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, टीडीपी नेते चंद्राबाबू नायडू, आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, कपील सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांच्यासह काही नेत्यांनी पत्रकार परिषद घेत इव्हीएमबद्दल पुन्हा एकदा शंका उपस्थित केली.

निवडणूक आयोग योग्यरित्या काम करत नाही, तसेच ईव्हीएममध्येही बिघाड आहे. एकाला मत दिल्यावर ते दुसऱ्याला जाते. व्हीव्हीपॅटमध्ये फक्त चार सेकंदच फोटो दिसतो. त्यामुळे ईव्हीएमच्या मुद्यावर विरोधक पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे सिंघवी यांनी म्हटले. ईव्हीएम मशीनमधील काही बटन खराब आहेत. ज्या ठिकाणी भाजपचे वातावरण नाही, तिथे मशीनमध्ये बिघाड केले जात असल्याचा गंभीर आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

व्हीव्हीपॅटमधील ५० टक्के स्लिप मोजल्या गेल्या पाहिजेत. सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपापूर्वी आपल्या एका निर्णयात व्हीव्हीपॅट मशीनमधील स्लिपची मोजणी वाढवली पाहिजे असे म्हटले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णर्याची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली आहे.