देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी नोटबंदी : प्रकाश आंबेडकर

वसई-विरार : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेना युतीचे सरकार म्हणजे डाकूचे सरकार आहे. देशाच्या तिजोरीवर डाका घालण्यासाठी त्यांनी नोटबंदी केली, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नालासोपारा येथील सेंट्रल पार्क येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला गृहीत धरू नेये. मोदी देशाचे राजे नाहीत, तर मतदार येथील राजा आहे, याची आठवण प्रकाश आंबेडकरांनी करून दिली. नरेंद्र मोदींनी देशाला खोटं बोलून लुटलं आहे. त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांना जनता आता पंतप्रधान करणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.

पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकमुळे जागतिक पातळीवर देशाची मान खाली गेली आहे. नरेंद्र मोदींचा खोटारडेपणा जगासमोर आला आहे. १२५ कोटी लोकांचा प्रतिनिधी, देशाचा पंतप्रधान खोटारडा आहे. भाजप- शिवसेना सरकार डाकूचे सरकार आहे. या सरकारला तिजोरीवर डाका घालायचा होता म्हणून नोटबंदी केल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला. नोटा बदलून देतो असे सांगून मोदींनी काळ्या अर्थव्यवस्थेला लुटले असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.