यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाईन – ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे ज्यांनी उद्घाटन केले त्या वैशाली येडे यांना प्रहारकडून लोकसभेसाठी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. प्रहारकडून याबाबत वैशाली येडे यांना विचारणा झाली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
ज्येष्ठ लेखिका नयनतारा सेहगल यांचे आमंत्रण रद्द केल्यानंतर उद्घाटक म्हणून काही नावं सुचवण्यात आली होती. संमेलनाचं उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी आयोजकांकडून करण्यात आली होती. ही मागणी मान्य करत महामंडळाने यवतमाळमधील कळंब तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची पत्नी वैशाली सुधाकर येडे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून मान दिला होता.
वैशाली येडे यांच्याविषयी…
वैशाली येडे या शेतकरी विधवा आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित ‘तेरवं’ नाटकात त्या जनाबाईची भूमिका करतात. वादग्रस्त ठरलेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचा मान त्यांना मिळाला होता. वैशाली यांच्या पतीने सात वर्षापूर्वी आत्महत्या केली. त्यांना २ मुले असून त्यांच्याकडे तीन एकर शेती आहे. त्या सध्या अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करत आहेत. मागिल एक वर्षापासून नाटक क्षेत्राशी त्या जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या जीवनावर प्रसिद्ध दिग्दर्शक हरीश इथापे यांनी ‘तेरवं’ हे नाटक लिहिले आहे. त्यात यांच्या जीवनाचा संघर्ष होता. त्या नाटकात त्यांनी भूमिका देखील केली आहे.