लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळावा : आमदार अशोक पवार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन –लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचाकडे एका पत्राद्वारे केली आहे.

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता एक ऑगस्ट 2020 रोजी होत आहे. साहित्य आणि समाजकारणात अण्णाभाऊ साठे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे. अण्णाभाऊ साठे यांनी वंचित समाजाच्या व्यथा, वेदना त्यांच्या साहित्यकृतीतून अतिशय परिणामकारकरित्या मांडल्या आणि समाजाला न्याय व हक्क मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले.

विविध समाजघटकांकडून या मागणीबाबत जोर धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाभाऊ साठेंना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी विनंती आमदार अशोक पवार यांच्याकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे.