लग्नाला विरोध होत असल्यानं प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली :  पोलीसनामा ऑनलाइन –   घरच्यांकडून लग्नाला होत असलेल्या विरोधामुळे एका प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील पांगरदरा डोंगरात उघडकीस आली. प्रेमीयुगुल राजदरी गावाचे रहिवाशी होते. आपण एकाच भावकीतील असल्याने तुम्हाला लग्न करता येणार नाही असे नातेवाईकांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि.10) घडली असून सोमवारी (दि.11) कळनुरी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सचिन दत्तात्रय कोऱ्हाळे (वय-22) आणि दीपा लक्ष्ण कोऱ्हाळे (वय-19 दोघे रा. राजदरी, ता. औंढा नागनाथ) असे आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. या दोघांची कुटुंब शेतात राहात असून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. शेळ्या चारायला हे दोघे सोबत जात असल्याने त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. या दोघांनी लग्न करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यांच्या लग्नाला त्यांच्या कुटुंबाकडून विरोध होत होता.

नात्याने दीपा ही सचिनची आत्या लागत होती. शिवाय भावकीतील मुलीशी लग्न शक्य नसल्याने घरच्यांनी या दोघांनाही समजावून सांगितले होते. वेळोवेळी लग्नासाठी विरोध होत असल्याने अखेर रविवारी दोघांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह औंढा नागनाथ येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. याप्रकरणी सोमवारी (दि.11) जनार्दन लक्ष्मण कोऱ्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कळमनुरी पोलीस ठाण्यात अकस्मक मृत्यूची नोंद केली आहे.