धक्कादायक ! लग्नाला विरोध केल्याने प्रियकराने मुलीच्या वडीलांचा केला गोळ्या झाडून खून

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन – लग्नाला विरोध केला आणि दिलेले पैसे परत केले नाहीत म्हणून प्रियकराने मुलीच्या वडीलांवर गोळ्या झाडून त्यांचा खून केल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे घारपुरीवाडी येथे गुरुवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.

ऋषिकेश विजय सनगरे (वय २१) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर भिकाजी कृष्णा कांबळे (वय ४३) यांचा गोळ्या घालून त्याने खून केला.

वेतोशी गावात राहणारे भिकाजी कांबळे हे गुरुवारी रात्री घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर गोळ्या झ़ाडण्यात आल्या होत्या. त्यांच्यावर गोळ्या झाडून आरोपी पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा त्याला रत्नागिरी रेल्वे स्थानकातून मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असताना अटक करण्यात आली.

ऋषिकेश याचे भिकाजी कांबळे यांच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. दरम्यान काही वर्षांपुर्वी ऋषिकेषने त्यांना १० हजार रुपये दिले होते. त्यांन पैसे परत केले नाहीत. त्यानंतर ते त्याच्या लग्नाला विरोध करत होते. या रागातून ऋषिकेषने त्यांच्यावर गोळ्या झाडून खून केला.