महाराष्ट्राच्या बससेवेबाबत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतला मोठा निर्णय

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून मध्य प्रदेशमध्ये येणाऱ्या व मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात जाणाऱ्या बससेवेवरील बंदी मध्य प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी महाराष्ट्र बससेवेद्वारे सुरू असलेली प्रवासी वाहतूक 21 ते 31 मार्चपर्यंत बंद केली होती. तसेच आता मध्य प्रदेश सरकारने भोपाळ, इंदौर, जबलपूर, बैतुल, छिंदवाडा, खरगोन आणि रतलाम येथील शाळा व महाविद्यालय 15 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काही कडक निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून बस सेवेवरील बंदीचा कालावधी वाढवला आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तसेच नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे. सध्या तरी लॉकडाउनचा कुठलाही विचार नसल्याचे मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे.