‘अल्पमतात आहे सरकार, उद्या सिद्ध करा बहुमत’, CM कमलनाथ यांना राज्यपालांचे ‘निर्देश’

इंदौर : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांना विधानसभेच्या पटलावर बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. जवळपास अर्ध्या रात्री राजभवनातून यासंदर्भातील पत्र राज्याचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांना पाठवण्यात आले.

राजभवनातून सीएम यांना जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार राज्यपालांनी सीएम यांना म्हटले की, मध्य प्रदेशात नुकत्याच घडलेल्या घटनांवरून दिसून येते की, राज्य सरकारचा सभागृहातील विश्वास संपुष्टात आला आहे आणि सरकार आता अल्पमतात आहे. ही स्थिती अत्यंत गंभीर आहे आणि सीएम कमलनाथ यांनी 16 मार्चला सभागृहात बहुमत सिद्ध करावे. दरम्यान, काँग्रेस राज्यपालांच्या या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाऊ शकते, असे वृत्त आहे.

अर्ध्या रात्री आले राज्यपालांचे पत्र
या पत्रात राज्यपाल लालजी टंडन यांनी एमपीमधील सध्याचा सर्व राजकीय घटनाक्रम मांडला आहे आणि सीएम कमलनाथ यांना विश्वासमत संपादन करण्यास सांगितले आहे. राज्यपालांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला माहिती मिळाली आहे की, 22 आमदारांनी मध्य प्रदेश विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला सुद्धा याबाबत माहिती दिली आहे. मी याबाबतचे मीडिया कव्हरेजही पाहिले आहे.

अभिभाषणानंतर तात्काळ विश्वासदर्श ठरावावर मतदान

राज्यपालांनी म्हटले आहे की, संविधानाच्या कलम 174 आणि 175 (2) मध्ये नमूद संविधानिक अधिकारांचा वापर करत निर्देश देत आहोत की, एमपीच्या विधानसभेचे सत्र 16 मार्चला त्यांच्या अभिभाषणाने सुरू होईल. राज्यापालांनी स्पष्ट म्हटले आहे की, त्यांच्या अभिभाषणानंतर तात्काळ सभागृहात एकमेव काम होईल, ते म्हणजे विश्वासदर्शक ठरावावर मतदान होईल.

मत विभाजनाच्या आधारावर होणार विश्वासदर्शक ठराव

राज्यपाल लालजी टंडन यांनी हे सुद्धा निर्देश दिले आहेत की, विश्वासदर्शक मतदान मतविभागणीनंतर बटन दाबून होईल. या संपूर्ण प्रकियेचे रेकॉर्डिंग विधानसभेद्वारे स्वतंत्र व्यक्तींकडून करण्यात येईल ना स्थगन, ना निलंबन, कोणत्याही स्थितीत व्हावा विश्वासदर्शक ठराव राज्यपालांनी म्हटले आहे की, वरील कार्यवाही कोणत्याही परिस्थितीत 16 मार्च 2020 ला पूर्ण करण्यात येईल. यादरम्यान ना स्थगन प्रस्ताव, ना विलंब आणि ना प्रक्रिया निलंबित करता येणार.

काँग्रेसचे 4 आणखी आमदार गायब

राज्यपालांनी पत्रात पुढे म्हटले आहे की, मला प्राथमिक दृष्ट्या विश्वास आहे की, तुमच्या सरकारचा सभागृहातील विश्वास संपुष्टात आला आहे. तुमचे सरकार अल्पमतात आहे, ही स्थिती गंभीर आहे. यासाठी संविधानिकदृष्ट्या हे आवश्यक आहे की, दिनांक 16 मार्च 2020 ला माझ्या अभिभाषणानंतर तात्काळ तुम्ही विधानसभेत विश्वासमत मिळवावे.

22 आमदारांनी दिला आहे राजीनामा
राज्यात मागील आठवड्यात राजकीय खळबळ उडाली होती. काँग्रेस सोडून भाजपात सहभागी झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांचे समर्थक 22 आमदार बेंगळुरूमध्ये होते. यामध्ये 6 मंत्रीसुद्धा होते. या सर्व 22 आमदारांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यापैकी 6 आमदार जे राज्यात मंत्री होते, त्यांचा राजीनामा विधानसभाध्यक्षांनी मंजूर केला आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस आमदार यावेळी जयपूरमध्ये आहेत. हे सर्व आमदार जयपूरहून भोपाळला रवाना होतील.