PM नरेंद्र मोदींचा दिग्गींना ‘दे धक्का’ ! 25 वर्षापुर्वीच्या ‘त्या’ बंडाचा काढला ‘वचपा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशच्या राजकीय स्थितीत मोठी उलथापालथ झाली आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या राजीनाम्यामुळे तेथील 20 पेक्षा जास्त आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे मध्ये प्रदेशात काँग्रेस सरकार कोसळणार की काय अशी स्थिती आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे ते आता भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जरी प्रत्यक्षात होळी साजरी करणार नाही असे म्हटले असले तरी त्यांनी खळबळ माजवत राजकीय होळी खेळल्याचे बोलले जात आहे. याशिवाय त्यांनी 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा बदला घेतला असल्याचे देखील बोलले जात आहे.

25 वर्षांपूर्वी नक्की काय झाले होते
1995 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक झाली. पहिल्यांदाच राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. 182 सदस्य संख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 उमेदवार निवडून गेले. या निवडणुकीची रणनीती नरेंद्र मोदींनी आखली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्रदीपक यशात त्यांचा मोठा वाटा होता. मोदींच्या अचूक रणनीतीला शंकरसिंह वाघेला यांच्या आक्रमकतेची आणि केशुभाई पटेल यांच्या लोकप्रियतेची साथ मिळाली. केशुभाई पटेल यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर भाजपमध्ये सर्वात मोठं बंड झालं. पटेल यांना मुख्यमंत्री केल्याने वाघेला नाराज झाले आणि पक्षाच्या 45 पेक्षा अधिक आमदारांना घेऊन मध्य प्रदेशातल्या खजुराहोमध्ये गेले. या आमदारांना त्यावेळी खजुरियाज म्हटलं गेलं. तर भाजपसोबत राहिलेल्या आमदारांना हजुरियाज (एकनिष्ठ) म्हटलं गेलं.

शंकरसिंह वाघेला 45 पेक्षा अधिक आमदारांसह मध्य प्रदेशातल्या एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार होतं. दिग्विजय सिंह त्यावेळी मुख्यमंत्री होते. भाजपने वाघेला यांचं बंड मोडून काढू नये, भाजप आमदारांची घरवापसी होऊ नये म्हणून दिग्विजय सिंह यांनी प्रयत्न केले होते, अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. वाघेला यांनी 45 पेक्षा अधिक आमदारांसह बंड केल्याने भाजप सरकार कोसळलं. काँग्रेसच्या पाठिंब्याने वाघेला मुख्यमंत्री झाले. जवळपास 2 वर्ष ते मुख्यमंत्री राहिले.

25 वर्षानंतर मोदींनी घेतला बदला
25 वर्षांपूर्वी भाजपने गुजरातमध्ये मिळवलेल्या यशात मोदींचा महत्त्वाचा वाटा होता. मात्र वाघेला यांच्यामुळे भाजपला पाच वर्षे सरकार चालवता आलं नाही. काँग्रेसमुळे आणि विशेषतः दिग्विजय सिंह यांच्यामुळे त्यावेळी गुजरातमधलं भाजप सरकार कोसळलं होतं. आता दिग्विजय सिंह यांच्याच मध्य प्रदेशमधलं काँग्रेस सरकार कोसळण्याच्या स्थितीत आहे. विशेष म्हणजे काठवरचं बहुमत असताना सत्ता स्थापन करण्यात दिग्विजय यांचा मोठा वाटा होता.

दिग्विजय यांच्या राजकारणामुळेच सिंधिया पक्षापासून दूर गेल्याचं बोललं जातं. आज सकाळी शिंदे यांनी मोदींच्या भेटीनंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मध्य प्रदेशात काँग्रेस सरकार मोठ्या अडचणीत सापडलं आहे. त्यामुळे मोदींनी 25 वर्षांपूर्वीच्या घटनेचा वचपा काढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.