लोकसभेसाठी रासपची युतीकडे पाच जागांची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने लोकसभेसाठी शिवसेना-भाजप युतीकडे पाच जागांची मागणी केली आहे. याबाबतची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली. तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने येत्या ५ मार्च रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व शिवसेनेमध्ये जागा वाटप निश्चित झाले आहे. मात्र, मित्रपक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. रासप हा भाजपाचा मित्र पक्ष आहे. त्यामुळे भाजपाकडून याबाबत विचार होईल, असेही हाके यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

या मागण्या मांडल्या जाणार –

महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासोबतच मुस्लिम आरक्षणप्रश्नी अंतिम निर्णय घ्यावा आणि लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला पाच जागा द्याव्यात या प्रमुख मागण्यांसह इतरही मागण्या राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने करण्यात येणार आहेत. महात्मा फुले व सावित्रीबाईंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे ,ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षणाची फेररचना करावी , सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे या मागण्या मांडल्या जाणार आहेत.

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत अजूनतरी सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही. आता रासपच्या मागणीनंतर तरी सरकार काय भूमिका घेईल हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व शिवसेना नेते व परिवहनमंत्री दिवाकर रावते हेही उपस्थित असणार आहेत.