कराड : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे सातारा जिल्ह्यातील कराड येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. कराड येथे आज आघाडीची महासभा आहे. लोकसभा निवडणूका आता जवळ आल्या आहेत, त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष प्रचाराच्या तयारीत आहेत.
प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच साताऱ्याचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी म्हणजेच प्रीती संगमला भेट दिली. यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करण्यात आले. त्यानंतर महाआघाडीच्या सभेला सुरुवात झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी यावेळी सभेला संबोधित केले. तसंच मोदी सरकारवर त्यांनी जोरदार टिका केली आहे. आत्ता सरकारविरोधी लाट आहे. सध्या देशात आणि राज्यात अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन आले आहेत. शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अवमान योजना या सरकारने आणल्या. ज्या योजनांचा शेतकऱ्यांना काहीच फायदा झाला नाही. दुष्काळ जाहीर होऊन तीन महिने होऊन गेले पण उपाययोजना नाहीत. दुष्काळी भागात जनावरं विकले जात आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला लागल्याशिवाय राहणार नाही, असे मुद्दे त्यांनी यावेळी मांडले.