भाजपनं नव्हे तर फडणवीस ‘चौकडी’नं त्रास दिला, एकनाथ खडसेंचा ‘खळबळजनक’ आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने आणि निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील काही वर्षापासून नाराज आहेत. त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकनाथ खडसे यांनी आपण भाजपवर कधीच नाराज नसल्याचे सांगितले आहे. मात्र, विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याभोवतीच्या चौकडीने आपल्याला त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

एकनाथ खडसे आज (शनिवारी) शनिशिंगणापूर येथे सहकुटुंब दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसे बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला. खडसे म्हणाले, भाजपसाठी आपले मोठे योगदान आहे. पक्षाने आपल्याला भरभरून दिले आहे. त्यामुळे आपण आपल्या पक्षावर नाराज होण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच मी पक्षावर कधी नाराज नव्हतो आणि नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळाले. मात्र, सरकार स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर अडून बसले. त्यामुळे सरकार स्थापन झाले नाही. फडणवीस आणि त्यांच्या भोवतीच्या चौकडीमुळे पक्षाचे मोठे नुकसान झाले. आपल्याला यावर खूप काही बोलायचे आहे, वेळ आल्यावर सविस्तर बोलणार आहे. सध्या राज्यात सत्तेवर आलेले खिचडी सरकार फार काळ टिकाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/