‘मुख्यमंत्र्यांनी घात केला’ असं म्हणत ‘या’ नेत्याची बंडखोरी

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर अनेक नेते बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. बंडखोरी रोखण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जात असतानाच अहमदपूरमध्ये भाजपच्या नेत्याने बंडखोरी केली आहे. दिलीप देशमुख यांनी मोठी रॅली काढत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तसेच त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. ज्यांना देव मानलं त्याच मुख्यमंत्र्यांनी घात केला, असे म्हणत मुख्यमंत्र्यावर टीकास्त्र सोडले. देशमुख हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. पण मागील तीन टर्मपासून त्यांना भाजपने डावले. त्यामुळे देशमुख यांनी या निवडणुकीत बंडखोरी करत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

उमेदवारी न मिळाल्याने दिलीप देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष करत पक्षाविरुद्ध बंडखोरी केली. त्यांच्या या निर्णयामुळे आता भाजपच्या उमेदवारासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, भाजपच्या अयोध्या केंद्रे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून आघाडीकडून तिकीट मिळवले आहे. त्यानंतर दिलीप देशमुख यांनी बंडखोरी केल्याने अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपची वाटचाल खडतर झाली असून या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे.

Visit : Policenama.com