भाजपची 27 मतदारसंघातील बंडखोरांमुळे वाढली डोकेदुखी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बंडखोरांच्या नाराजीमुळे सर्वच प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे. या नेत्यांच्या बंडखोरीचा फडका आपल्या उमेदवाराला बसू नये यासाठी त्यांना थंड करण्याचे प्रयत्न प्रत्येक पक्षातील श्रेष्ठींकडून केले जात आहेत. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाल्याने इच्छूकांना उमेदवारी मिळाली नसल्याने भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. भाजपच्या बंडखोरांना स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील संपर्क साधून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगत असल्याची माहिती आहे.

विधानसभा निवडणुकीचा कार्य़क्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षातील इच्छूकांनी निवडणुकीची तयारी सुरु केली. तर काही इच्छूक उमेदवारांनी निवडणुकाच जाहीर होण्याच्या आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र, पक्षाकडून उमेदवारी मिळाली नसल्याने नाराज इच्छूक उमेदवारींनी बंडखोरी करुन उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपकडून 27 मतदारसंघात तब्बल 114 जणांनी बंडखोरी केली आहे. कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भाजपचे सर्वाधिक बंडखोर असून या ठिकाणी 9 जणांनी बंडखोरी केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्याचा (सोमवार) शेवटचा दिवस असल्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांकडून बंडखोरांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे उद्या नेमके कितीजण आपला उमेदवारी अर्ज मागे घेतात त्यावर राज्याच्या राजकारणीची गणितं ठरु शकतात.

मागील अनेक दिवसांपासून मतदारसंघामध्ये मोर्चेबांधणी करत असताना ऐन मोक्याच्या क्षणी शुल्लक चुकीमुळे काही नेत्यांना निवडणुकीपासून दूर रहावे लागत आहे. राज्यातील 798 इच्छूकांना त्यांनी केलेल्या चुकीमुळे निवडणुकीपासून दूर रहावे लागत आहे. राज्यभरातील तब्बल 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे विजयासाठी प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे.

Visit : Policenama.com