‘एक्झिट पोल’मधील आकडेवारीमुळं वाढू शकते शिवसेनेची ‘डोकेदुखी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघांमध्ये काल सोमवारी मतदान पार पडले. एक्झिट पोलमध्ये भाजप-शिवसेना युतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातही भाजपला 141 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. निकालात भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे बहुमताचा 145 हा आकडा गाठण्यासाठी भाजपला शिवसेनेचीही मदत घ्यावी लागली. मात्र या निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 141 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला अवघ्या 5 जागांची आवश्यकता भासेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला इतक्या जागा मिळाल्या तर भाजप शिवसेनेला सत्तेत भागिदार करुन घेणार का? हा एक प्रश्न आहे. शिवसेनेला 102 जागा मिळतील अशीही शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मागील विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा चांगल्या जागा मिळूनही शिवसेनेवर सत्तेपासून दूर राहण्याची वेळ येऊ शकते.

एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. गुरुवारी, 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालातच सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

Visit : Policenama.com