मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा एकही उमेदवार उतरवला नाही. त्यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचारसभांचा धडाका लावत त्यांच्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. या सगळ्याचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी नागरिकांमध्ये आपली प्रतिमा पुन्हा एकदा भक्कम केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना आघाडीत घेण्यास अनुकूल आहे. मात्र काँग्रेसचा या गोष्टीला विरोध आहे. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीला ‘एकला चलो रे’चीच भूमिका घेणार, असे सद्यस्थितीत दिसत आहे.
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मनसेची साथ हवी आहे, मात्र उत्तर भारतीयांना असलेल्या विरोधामुळे काँग्रेस त्यांना आघाडीत घेण्यास कानकुस करत आहेत. मनसेची भूमिका आणि काँग्रेसची भूमिका पूर्णपणे विरोधी असून, मनसेच्या भूमिकेचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करता येणार नाही, असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटल्याने सध्या मनसेची भूमिका हि एकला चलो रे अशीच दिसत आहे.
दरम्यान, आजच्या ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी शेतकरी मोर्चात स्वबळावर कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर शरद पवार यांची साथ त्यांना आहेच. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी मनसेला छुपा पाठिंबा देईल, अशी चर्चा सध्या रंगते आहे. राज ठाकरे यांनी देखील मनसे कार्यकर्त्यांनी लोकसभेच्या निकालाची काळजी न करता विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.