महाराष्ट्र बंद : वंचित आघाडीच्या मोर्चावर पोलिसांकडून ‘लाठीहल्ला’, अमरावतीत ‘तणाव’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सीएए आणि एनआरसीच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचा दावा प्रकाश आंबडेकर यांच्याकडून करण्यात आला. या बंदमध्ये एकूण 35 संघटना सहभागी होणार असल्याचे ते म्हणाले. कुटूंब आर्थिक परिस्थितीत अडकलं की जशी नामुष्की येते तशी देशाची बिकट परिस्थिती झाली आहे. लोकांनी बंदात सहभागी व्हावं अन्यथा सरकार मनमानी पद्धतीने वागेल असं ही ते म्हणाले.

आता या आंदोलनाला काही ठिकाण हिंसक वळण लागले आहे. सोलापूर, चेंबूर येथे बसेसची तोडफोड करण्यात आली. तर वंचितच्या आंदोलनाला हिंसक वळण देण्यामागे भाजप, आरएसएसचा डाव आहे. चेंबूर येथे काही कार्यकर्त्यांनी बसची तोडफोड केली, मात्र ते कार्यकर्ते वंचितचे नव्हते. काहीजण तोंडावर रुमाल बांधून आले होते. त्यांनी ही दगडफेक केली असा आरोप प्रकाश आंबडेकरांनी केला.

अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण लागले. आंदोलन करणाऱ्यांनी अमरावतीमधील इर्विन चौकाजवळ असलेल्या दुकानांवर दगडफेक केली आहे. पण दगडफेक करणाऱ्यांना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता सर्वत्र शांतता असून अमरावती शहर सुरळीत सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आंदोलनासाठी इर्विन चौकात जमा झाले होते, पण काही वेळांनंतर त्यांनी तेथील दुकानांवर दगडफेक सुरु केल्याने पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला.

बदलापूर येथे रस्त्यावर उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गायकवाड यांच्यासह मिलिंद वानखेडे, मनोज तायडे, किसन कांबळे, गायक संजय गायकवाड, सिध्दार्थ डोळस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सीएए आणि एनआरसीविरोधात सोलापूरात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून मूकमोर्चा काढण्यात आला. छगन मिठा पेट्रोल पंप चेंबूर येथे आंदोलक रस्त्यावर उतरले होते.

महाराष्ट्र बंद हा स्वयंस्फुर्तीने लोकांनी केला आहे. कोणत्याही प्रकारचा कर्फ्यु लागू होणार नाही. बंद शांततेच्या मार्गाने पार पडेल याची खबरदारी घेण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केले.

चेंबूर औरंगाबादमध्ये सिटीबसवर दगडफेक करण्यात आली, वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मनमाडमध्ये देखील वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बाजारपेठ बंद करण्यात आल्या. सोलापूरात देखील वंचितच्या कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यात आला आहे. मुंबईत नाक्या नाक्यावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.

फेसबुक पेज लाईक करा –