Maharashtra Budget 2021 : भाजप आमदारांच्या घोषणा अन् बारामती कनेक्शन; फडणवीसांना हसू अनावर ! बजेटवरून केली टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या दुसऱ्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार टीका केली आहे. केंद्राकडून आलेला निधी सांगायचा नाही. केवळ थकबाकी सांगायची. केंद्राच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख अर्थसंकल्पात करायचा. मात्र, इतर वेळी केंद्रावर टीका करायची हेच महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. अर्थसंकल्पात याचाच प्रत्यय आला. महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे रडगाणं असल्याची टीका फडणवीस यांनी केली. विधिमंडळातून बाहेर पडल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

भाजप आमदारांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पुणे-बारामती अर्थसंकल्प मांडणाऱ्यांचा धिक्कार असो. यात थेट बारामतीचा उल्लेख केल्याचं पाहून आणि अप्रत्यक्षपणे अजित पवार यांचा उल्लेख केल्याचं पाहून फडणवीसांना हसू अनावर झालं.

‘कोणतंही रडगाणं न गाता महाविकास आघाडी सरकार वाटचाल करतंय’
अजित पवार म्हणाले, केंद्राकडून महाराष्ट्राला साडेचौदा हजार कोटी रुपये यायचे आहेत. केंद्रानं राज्याच्या वाट्याचा महसूल थकवला आहे. मात्र, त्याबद्दल कोणतंही रडगाणं न गाता महाविकास आघाडी सरकार वाटचाल करत आहे.

‘काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प’
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, साडेचौदा हजार काेटी शिल्लक असल्याचं सांगतात, परंतु 3 लाख कोटी रुपये दिल्याचं सांगत नाहीत. महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प म्हणावं की, काही विशिष्ट भागांपुरता मर्यादित असलेला अर्थसंकल्प म्हणावं असा सवालही त्यांनी केला.

‘पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत’
पुढं बोलताना ते म्हणाले, अजित पवारांनी केलेल्या घोषणांमध्ये बरेचसे प्रकल्प आधीपासूनच सुरू आहेत. यातले काही प्रकल्प केंद्र सरकारच्या मदतीनं प्रगतिपथावर आहेत. त्यात अनेक रस्ते, महामार्ग, सिंचन आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचा समावेश आहे. एका बाजूला केंद्राला नावं ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या मदतीनं सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख स्वत:च्या अर्थसंकल्पात करायचा, अशी सोयीस्कर भूमिका राज्य सरकार घेत असल्याचंही फडणवीस म्हणाले.

‘ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली’
देवेंद्र फडणवीसांनी शेतकरी आणि पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात एकाही पैशाची तरतूद नाही. मूळ कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत अर्थसंकल्पात नाही. सोयाबीन, कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली आहे.

‘पेट्रोल-डिझेल’वरील दर कमी करण्याचा निर्णयदेखील नाही
वीजबिल आणि पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावरून बोलताना फडणवीस म्हणाले, वीजबिलासंदर्भात सरकारनं कोणताही दिलासा जनतेला दिलेला नाही. पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलेला नाही. त्यामुळं आता केंद्राकडे बोट दाखवण्याचा त्यांना कोणताही अधिकार राहिलेला नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.