अंदर की बात ! ‘महाविकास’चं ‘सरकार’ कसं आलं, संजय राऊतांनी सांगितलं

मुंबई, पोलिसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात पुन्हा एकदा फडणवीस सरकारच येणार अशी चिन्ह दिसत होते. कारण एकंदरीत सर्व परिस्थिती बघता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री पदी विराजमान होतील असे दिसत होते. परंतु राजकारण म्हटले की, कधीही काहीही होऊ शकते, तसेच महाराष्ट्रात झाले आणि महाविकास आघाडी स्थापन होऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. दरम्यान भारतीय जनता पक्षाचे राज्य महाराष्ट्रात कसे आले नाही? यापेक्षा एकमेकांचे विरोधक असणारे तीन पक्ष एकत्र येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा झाला ते समजून घेतले पाहिजे. २४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या काळात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या आणि त्यातून एक ८० तासांचे सरकार आले आणि गेले. त्या औटघटकेच्या सरकारचे पुसटसे स्मरणही कुणाला नाही. या सर्व खेळात राजभवनाची भूमिका ‘खलनायकी’ ठरली असं संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मी व्यक्तिशः चांगले ओळखतो आणि ते एक सज्जन गृहस्थ आहेत. राजभवनात जाऊन मी त्यांना भेटलो. तेव्हा राज्यपाल कोश्यारी यांनी स्पष्ट सांगितले, ‘‘मी घटनेला बांधील आहे. घटनेची चौकट मोडून मी काही करणार नाही. राजभवनातून बदनाम होऊन मी जाणार नाही,’’ असे सांगणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांनी भाजपचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना घाईघाईतच शपथ दिली व अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. अजित पवारांनी दिलेल्या आमदारांच्या सह्या मान्य करून त्यांनी पुढचे सर्व प्रकरण घडवले असे देखील त्यांनी स्पष्ट केले. आणि यात राजभवनापेक्षा ‘वरचा आदेश’ महत्त्वाचा ठरला असा देखील आरोप त्यांनी केला.

अजित पवार यांच्या राजकारणाला बऱ्याच लोकांनी अवसानघातकी व धोक्याचे ठरवले परंतु असे ज्यांना वाटते त्यांनी एक समजून घेतले पाहिजे अजित पवार देवेंद्र फडणवीसांना जाऊन मिळाले म्हणूनच तीन पक्षांची आघाडी अधिक घट्ट महाविकास आघाडीचे सत्तेचे दरवाजे अधिक खुले झाले. फडणवीसांनी जे काही फोडाफोडीचे राजकारण माजवले होते त्याला लगाम बसवण्यासाठी अजित पवारांची भूमिका महत्वाची ठरली तसेच फडणवीसांचे फोडाफोडीचे भ्रष्ट राजकारण लोकांच्या तिरस्काराचा विषय ठरले. आमदारांवर दबाव निर्माण झाला व सर्वच आमदार शरद पवारांकडे परत गेले व शेवटी एकाकी राहिलेल्या अजित पवारांनाही मागे फिरण्याशिवाय पर्याय नव्हता. असं सांगत अजित पवारांच्या बंडामुळे भाजपाचा चेहरा समोर आला असं संजय राऊतांनी सांगितले.

तसेच शरद पवार व काँग्रेस हे तर आधीपासूनच एकत्र आहेत, त्यात शिवसेनाही सामील झाली आणि सत्तेची समीकरणे बदलली. या परिवर्तनात सर्वात महत्वाचा चेहरा म्हणजे शरद पवार. शरद पवार यांनी पुढाकार घेतला नसता तर महाराष्ट्रात आज चित्र वेगळे असते. अशा प्रकारचे एखादे सरकार निर्माण होऊ शकते यावर सुरुवातीला शरद पवारही विश्वास ठेवायला तयार नव्हते. शरद पवार प्रथम सोनिया गांधी यांना भेटले तेव्हा सोनिया गांधी यांनीही हा प्रस्ताव मान्य केला नाही. कारण दोन विरोधी पक्ष एकत्र येणे ही खूप मोठी बाब असते. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते त्यास डावलून एकत्र येणे हे खूप अवघड असते. त्यामुळे शिवसेनेबरोबर कसे जायचे? हा त्यांचा पहिला प्रश्न सोनिया गांधींना पडला होता तसेच अल्पसंख्याक तसेच हिंदी भाषिक पट्टय़ात काय प्रतिक्रिया होईल? ही शंका देखील त्यांनी व्यक्त केली असा खुलासा संजय राऊतांनी केला आहे.

शरद पवारांनी पुढाकार घेत सोनिया गांधींना मागील काही घडामोडी लक्षात आणून दिल्या आणि सांगितले की, बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधी यांचे संबंध सलोख्याचे होते. आणीबाणीनंतरच्या काळात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेसच्या विरोधात उमेदवार उभे केले नव्हते. प्रतिभाताई पाटील व प्रणव मुखर्जी या राष्ट्रपतीपदाच्या ‘काँग्रेजी’ उमेदवारांना शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून आपण स्वतः बाळासाहेब ठाकरे यांना भेटलो होतो असे देखील त्यांनी सांगितले. आणि जरा खोलात जाऊन बघितले तर मुंबईतला हिंदी भाषिक वर्ग शिवसेनेला मतदान करतो म्हणून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता येत राहिली अशी माहिती पवार यांनी सोनियांना दिली. काँग्रेस पक्ष आजही ‘राज्यकर्त्या’ वतनदारांच्या भूमिकेत आहे. ‘राष्ट्रीय’ राजकारणावर काय परिणाम होईल? या चिंतेत काँग्रेसने एक महिना घालवला, पण महाराष्ट्रासारखे राज्य भाजपच्या हाती राहू नये यावर शेवटी पक्षातच एकमत झाले आणि त्याबाबत हालचाली सुरु होऊन या सर्व घडामोडी घडल्या असे राऊत यांनी स्पष्ट केले.

Visit : Policenama.com