‘मोदी है तो मुमकीन है…’ देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला ‘हा’ विश्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याचे जवळपास निश्चित झाले असतानाच आज सकाळी राजकीय भुकंप झाला. यामुळे राज्याच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी शपथ घेऊन राज्यालाच नाही तर देशाला हादरवलं.

भाजप आणि राष्ट्रवादी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थोडक्यात आपली प्रतिक्रीया दिली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुंबईतील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांना संबोधताना फडणवीस यांनी ‘मोदी है तो मुमकीन है…’ असे म्हणत केंद्र सरकारच्या पुढाकारानेच ही खेळी यशस्वी झाल्याचे संकेत दिले. आजच्या राजकीय घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागल्याचे पहायला मिळत असून राष्ट्रवादीमध्ये ही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

मुंबई भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, अपक्ष आणि समर्थन देणाऱ्या सर्वच आमदारांचे आभार मानतो. आपली बांधिलकी ही महाराष्ट्रातील जनतेशी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या समर्थनातून स्थिर सरकार दिलंय. मी आपल्याला विश्वास देतो की पाच वर्षे अत्यंत ताकदीने, मजबुतीने हे सरकार काम करेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार राज्य सरकार काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Visit : Policenama.com