‘उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा’, CM ठाकरेंनी भाजपला ‘सुनावलं’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळाला. सावरकर मुद्यानंतर भाजपने शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधानसभा डोक्यावर घेतली. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. एवढंच नाही तर दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये हाणामारी झाल्याने वातावरण आणखीनच चिघळलं. यानंतर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दोन्ही पक्षांची बैठक आपल्या दालनात बोलावून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या बैठकिनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा शेतकऱ्यांचा कळवळा हा खोटा आहे. भाजपने उगाच इथे बोंबलू नये, केंद्राकडे जाऊन पैसे मागावेत असे त्यांनी भाजपला सुनावलं. उद्धव ठाकरे म्हणाले, हे या सरकारचं पहिलं अधिवेशन आहे. सभागृहाचं कामकाज जग बघतं. माझी दोन्ही पक्षांना विनंती आहे की सभागृहाच्या इतिहासाला काळिमा फासू नका.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, फक्त विरोधी पक्ष आहे सत्तारुढ पक्षाला काही देणं नाही हे चित्र उभे करण्याचा प्रयत्न केला जातोय. शेतकऱ्यांना वचन दिलंय ते आम्ही पाळणार. फक्त बोंबल्ल्याने प्रश्न मार्गी लागत नाही. आम्ही सामना वाचत नाही म्हणाऱ्यांना सामना हातात घेण्याची वेळ आली. आधी सामना वाचला असता तर विरोधात बसण्याची वेळ आली नसती. चोरून सामना वाचण्यापेक्षा उघडपणे वाचला असता तर आज सामना करायची गरज नसती. पूरग्रस्तांसाठी 7 आणि अवकाळी पावसासाठी 7 हजार कोटी केंद्राकडे मागितल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच विरोधकांनी इथे गळा मोकळा करण्यापेक्षा केंद्राकडे करावा, हवं असल्यास घसा मोकळा करण्याच्या गोळ्या मी देतो असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/