…म्हणून पोलिसांच्या प्रत्येक कृतीवर प्रश्न विचारला जातो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीतील उप-निरिक्षकांच्या ११८ व्या सत्राचा दीक्षांत संचलन समारंभावेळी मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. त्यावेळी ठाकरे बोलताना म्हणाले, सेवा करताना पोलिसांना अनेक भूमिका बजावाव्या लागतात. चित्रपटात दाखवतात आणि प्रत्यक्षातील पोलिसांमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. प्रत्यक्षात पोलिसांना जमिनीवर राहून काम करावे लागते. त्यासाठी त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाबरोबरच प्रसंगावधनाच बाळगावे लागते असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

११८ व्या सत्रातून ६६८ पोलीस उपनिरिक्षकांचे (PSI) प्रशिक्षण पूर्ण झाले. ज्यामध्ये ४७० पुरूष, १८८ महिला आणि १० गोवा केडरचे प्रशिक्षणार्थी यांचा समावेश आहे. पोलीस उपनिरिक्षक (PSI) शुभांगी शिरगावे यांना सर्वोत्तम प्रशिणार्थींचा सन्मान आणि त्यासाठी रिव्हॉल्व्हर पारितोषिकाच्या त्या मानकरी ठरल्या. याशिवाय सलिम शेख, अविनाश वाघमारे हे उत्कृष्ट प्रशिणार्थी ठरले. दीक्षांत संचलन समारंभात प्रशिणार्थी शुभांगी शिरगावे यांनी परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कौतुक करत म्हणाले, खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना जल्लोष होणारच. परंतु बेहोश होऊन चालणार नाही. जोश आणि होश यांचे तारतम्य बाळगावे लागेल. त्यासाठी भानावर राहावेच लागेल, असे म्हणत, खडतर प्रशिक्षणानंतर आपण एखादी गोष्ट कमावतो. त्याचा आनंद मोठा असतो. आजचा कार्यक्रम गेल्यावर्षी प्रत्यक्ष अनुभवला आहे. अंगावर रोमांच येतात. भारावून जाणारा समारंभ असतो. शिस्त आणि देखणेपणाचा अनोखा संगम या समारंभात असतो. आज मात्र मास्क घालूनच हा कार्यक्रम करावा लागतो. पोलीस दलाचे हेच महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शिस्त आणि नियमांचे पालन करत आहोत.

पुढे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आजच्या समारंभातून कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी महाराष्ट्राला देत आहोत. आपले शूर जवान टोकाच्या गडचिरोलीत सुद्धा नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करताहेत. त्यांना टिपताहेत. महाराष्ट्राच्या मुळावर उठणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काम करत आहेत, तर प्रशिक्षणार्थींनी स्वतःहून हे आयुष्य निवडलं आहे. ते साधसुधं नाही. यातून त्यांनी त्यांच्याकडे आत्मविश्वास आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे स्वतःहून हे क्षेत्र निवडण्यासाठी आणि कुटुंबापासून दूर राहून खडतर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या या प्रशिणार्थींना मानाचा मुजराच करावा लागेल. तुम्ही एक स्वप्न पाहिलं होते. आणि त्या स्वप्नातल्या जगात पहिले पाऊल टाकत आहेत. तेही निधड्या छातीने. करोनाचा विषाणू जसा आपले रुप बदलतो आहे. त्याचा आता सेकंड म्युटंट आला आहे. तसेच काहीसे आता रुप बदलणारी गुन्हेगारी आली आहे. गुन्हेगारी क्षेत्राचे हे आव्हान आता ऑनलाईन आणि त्या स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये वाढू लागले आहे. बँकिंगमधील ऑनलाईन गुन्ह्यांचा बंदोबस्त करावा लागणार आहे. गुन्हे ऑनलाईन असले, तरीही त्या गुन्हेगारापर्यंत पोहचून त्याला प्रत्यक्ष खऱ्या बेड्या घालव्या लागणार आहेत.

दरम्यान, प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडत आहात. तुमचे कुटुंबीय अधीरतेने तुमची वाट पाहत आहेत. पण आतापर्यंत तुम्ही प्रशिक्षणार्थी तुमच्या कुटुंबियांचे होता. पण आता संपूर्ण महाराष्ट्र हेच तुमचे कुटुंब आहे. या कुटुंबाला आता तुमचा आधार असणार आहे. तुमच्या स्वप्नात आता महाराष्ट्राचे स्वप्न मिसळून पाहावे लागणार आहे. तुम्हाला रक्षक, भाऊ, पुत्र म्हणून काम करावे लागणार आहे. लोक तुमच्याकडे विश्वासाने येणार आहेत. त्या जनतेचा विश्वास तुम्ही सार्थ ठरवाला असा विश्वासही मला आहे. त्यासाठी राज्याच्या या परिवारात तुमचे स्वागत. महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कारकिर्द असणारे अधिकारी म्हणून तुम्ही सेवा बजावाल, अशा शब्दात एक अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.