मराठा आरक्षणाबाबत 2 ते 3 दिवसांत निर्णय जाहीर करणार : मुख्यमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे समाजातील नाराजी वाढत आहे. त्यामुळे अकरावी, पदवी व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. या पेचातून मार्ग काढण्यासाठी अध्यादेश काढण्यासह वेगवेगळे पर्याय पुढे आले आहेत. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर विरोधकांशी मराठा आरक्षणावर चर्चा केली. दोन ते तीन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या दिशेने आहोत.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्व पक्षांनी एकमताने घेतला होता. आरक्षण देण्यासाठी सर्वजण वचनबद्द आहोत. बैठकीत पुढील न्यायालयीन लढाई कशी करायची आणि त्याचसोबत जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजातील तरुण, तरुणींना काय दिलासा द्यायचा हादेखील प्रश्न होता. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केल्या आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. विरोधी पक्षातील नेत्यांशी बोललो तेव्हा त्यांच्याही सारख्याच सूचना आल्या आहेत. या सगळ्या सूचना एकत्र करुन उद्या किंवा परवा निर्णय जाहीर करु.

सर्व सूचना एकत्र करुन, कायदेतज्ञांशी चर्चा करुन सरकार पुढील पाऊल टाकले जाईल. आमच्या आधीच्या सरकारने जी वकिलांची टीम दिली होती त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही असेही त्यांनी सांगितले आहे. सरकार ऐकत नाही तेव्हा आंदोलन करायचे असते. सरकार खंबीरपणे, ठामपणे तुमच्यासोबत आहे. कोणताही पक्ष आरक्षणाविरोधात बोलत नाही. असे सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आंदोलन न करण्याचे आवाहन मराठा संघटनांना केले आहे .