CM उद्धव ठाकरेंचं PM मोदींना पत्र, ‘या’ महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक संस्था आणि संघटनांनी केंद्र सरकारकडे मागणी केली होती. मात्र हे प्रकरण मनुष्यबळ विकास मंत्रालयात रखडलेले आहे म्हणून आता यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी आता मुख्यमंत्र्यांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे आणि पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष देण्याची विनंती केली आहे.

प्रा.रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखालील समितीनं पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केला होता. आतापर्यंत केंद्रानं तमिळ, संस्कृत, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेला हा दर्जा दिलाय.

राज्य सरकारच्या तज्ञ समितीने 16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर केलेला होता. मात्र हा प्रस्ताव अजूनही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यामुळे आता पंतप्रधांनांनीच यामध्ये लक्ष घालावे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे नेमकं काय ?
१) प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा.

२) त्या भाषेला दीड ते अडीच हजार वर्षांचा इतिहास हवा.

३) ज्या भाषेतलं साहित्य श्रेष्ठ दर्जाचं ती भाषा अभिजात.

४) त्या भाषेला भाषिक आणि वाडःमयीन परंपरेचे स्वयंभूपण असावे.

प्रा. रंगनाथ पठारे समितीनं आपल्या अहवालातून याबाबतची उत्तम मांडणी केली आहे. मराठीचं वय 800 वर्षे सांगितलं गेल्यामुळंही त्याला अभिजात दर्जा मिळण्यासाठी अडथळे येत होते. मराठी ही संस्कृतपासून जन्माला आली हा गैरसमज पुराव्यानिशी दूर करण्याचा प्रयत्न पठारेंनी त्यांच्या अहवालाच्या माध्यमातून केला आहे.

राज्यसरकारने दिले आहेत हे संदर्भ
मराठी ही फक्त प्राचीन भाषा आहे असं नाही तर, तिच्यात श्रेष्ठ साहित्याची सातत्यपूर्ण परंपरा आहे. म्हणूनच मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून मागणी केली जातेय. गाथा सप्तशती हा मराठीतील मूळ ग्रंथ असल्याचा पुरावाही पठारे समितीनं सादर केला आहे. त्यामुळं या भाषेचं वय दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे, याचा अंदाज येऊ शकेल.

एकूण 52 बोली भाषेपासून आपली मराठी भाषा नटलेली आहे. मराठी भाषेची महती दुर्गा भागवतांचे आजोबा राजारामशास्त्री भागवत यांनी 1885 साली, तर ज्ञानकोषकार श्री. व्यं. केतकर यांनी 1927 सालीच त्यांच्या ग्रंथांमधून लिहून ठेवली आहे. मराठी अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य सरकारने अशा प्रकारचे प्राचीन संदर्भ दिले आहेत.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/