‘कोरोना’च्या बाबतीत महाराष्ट्राला दिलासा, रुग्ण जास्त मात्र ‘मृत्यूदर’ कमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी असली तरी महाराष्ट्राला कोरोना साथीच्या रोगामध्ये दिलासादायक चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी राज्यातील मृत्यूदर हा कमी आहे. राज्यातील मृत्यृदर हा 3.25 टक्के आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार कोरोनाचे कमी प्रमाण असलेल्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील मृत्यूदर कमी आहे. देशातील सर्वात जास्त कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रात रविवारी कोरोनाची 3041 नवीन प्रकरणं दिसून आली. त्यानंतर राज्यातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 50231 वर पोहचला. तर 1635 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यात महाराष्ट्रापेक्षा कोरोनाव्हायरसची प्रकरणं कमी आहेत, त्या राज्यातील मृत्यूदर महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. याशिवाय महाराष्ट्रात कोरोनामुळे ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

त्यांना यापूर्वीच गंभीर आजार होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांमध्येही 71 टक्के म्हणजे 1120 कोरोना रुग्ण इतर आजाराने ग्रस्त होते. तर फक्त 29 टक्के म्हणजे 468 रुग्ण हे असे होते त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यामुळे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 33 टक्के आहे. आतापर्यंत 13404 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.