मुख्य सचिवांचा इशारा ! महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनची गरज; अन्यथा 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आज (शनिवार) राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. या बैठकी दरम्यान राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक राज्याला महत्वाचा इशारा दिला आहे. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे अन्यथा १५ एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे राज्याच्या निर्णयाबाबत आज बैठक घेण्यात येत आहे. तसेच बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सर्वांना एकमुखानं निर्णय घेऊन सर्वांनी जनजागृती केली पाहिजे. सर्वांच्या साथीची आवश्यकता आहे, असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रमुख विरोधी पक्ष नेते आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन माध्यमाद्वारे बैठकीत संवाद साधत आहेत. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, राजेश टोपे, अमित देशमुख, तसेच नाना पटोले, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांतदादा पाटील आदींची उपस्थिती आहे.

बैठकीदरम्यान मंत्री, नेत्यांनी मांडलेले मत –
राजेश टोपें –

महाराष्ट्राला मदत व्हावी म्हणून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घ्यावा. किमान मी तरी कोरोनाबद्दल राजकारण करत नाही. पुणे, मुंबई, नागपूरमध्ये व्हेंटिलेटर वाढवण्याची गरज असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस –
आम्ही राजकारण बंद करतो परंतु तुमच्या मंत्र्यांना आणि सहकाऱ्यांनाही समज द्या, आम्ही सहकार्य करू परंतु त्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या. मंदिरावर अवलंबून असलेले, केशकर्तनालय यांच्या मदतीचा विचार व्हावा. पूर्ण नुकसान भरपाई नको पण ही लोकं जगली पाहिजे याचा विचार व्हावा, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण –
निर्बंध लागू करताना गरजू घटकांचाही विचार व्हावा. सरकारची भूमिका आणि निर्णयाबाबतचा अपप्रचार आणि गैरसमज टाळण्यासाठी आणि वस्तुस्थिती अधिकृतपणे लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी निवडक मंत्री नेमणूक करून त्यांनी नियमित ब्रिफिंग करावी. राज्याने चाचण्या वाढवल्याने रूग्णांची संख्या वाढणे स्वाभाविक आहे. ही वस्तुस्थिती लोकांपर्यंत गेली पाहिजे. कर्जफेडीसाठी गतवर्षीप्रमाणे पुन्हा मॉरेटोरियम योजना लागू करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती करावी. केंद्राकडून कोरोना लसीचे वितरण रूग्ण संख्येच्या प्रमाणात होण्याबाबत विनंती करणे. कठोर लॉकडाऊन लागू होणार असेल तर बाहेरगावी असलेल्या नागरिकांना आपआपल्या घरी जाण्यासाठी म्हणून काही कालावधी देण्यात यावा. तसेच, गतवर्षीप्रमाणे अचानक लॉकडाऊन लागू झाला तर त्यातून पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतील, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.