मुंबई बत्तीगुल प्रकरण : गृहविभागाला देण्यात आलेल्या अहवालात करण्यात आले ‘हे’ 3 खुलासे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  मुंबईत झालेल्या बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याच्या न्यूयॉर्क टाईम्स आणि रेकॉर्डेड फ्युचर नेटवर्क अ‍ॅनालिसीस कंपनीने दावा केला होता. आता यावर महाराष्ट्राच्या सायबर सेलने या संदर्भातला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ गंभीर मुद्द्यांचे खुलासे केले आहेत. तसेच याप्रकरणी मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाल्याचे शक्यता वर्तवली जात आहे. हा संपूर्ण अहवाल राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी या आधारावर प्रकरणाचा सविस्तर तपास आणि चौकशी करण्यात येईल अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली.

सायबर सेलच्या अहवालातील ३ गंभीर खुलासे

१) १४ ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा हाती लागला आहे.

२) ८ जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

३) ब्लॅकलिस्टेड आयपी अ‍ॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

…म्हणून चीननेच सायबर हल्ला करुन मुंबईची बत्तीगुल केली!

भारत आणि चीन या दोन देशामधील संबंध सध्या खूप ताणले आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला याची प्रचिती आली असेल. तसेच दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवान प्रांतामध्ये भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झटापटसुद्धा झाली होती. याच कालावधीमध्ये म्हणजेच १२ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अनेक भागांमधली वीज दिवसभर गेली होती. काही ठिकाणी तर ती डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच आली होती. तेव्हा ठाणे जिल्ह्यातल्या पडघा लोड डिस्पॅच सेंटरमध्ये ट्रिपिंग झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले होते.

न्यूयॉर्क टाईम्सकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीकडून या यासंदर्भातला सविस्तर ब्लॉग प्रकाशित करण्यात आला आहे. यामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरच हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लावल्याचे नमूद करण्यात आले आहे. याच मालवेअरच्या मदतीने मुंबईला वीजपुरवठा करणारी यंत्रणा हॅक करण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.