दहावी आणि बारावीच्या परीक्षासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या काळात शाळा व कॉलेज बंद असल्यामुळे सगळे शिक्षण ऑनलाईन करण्यात आले होते. तेव्हा या परीक्षा ऑफलाईन होणार कि ऑनलाईन हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर होता. तेव्हा आता राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या परीक्षांसंदर्भात महत्वाची माहिती दिली. दहावी आणि बारावीची परीक्षा ठरलेल्या वेळेत आणि ऑफलाइन होणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० मे रोजी तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान घेण्यात येणार आहे.

बोर्डाची परीक्षा ठरल्यानुसारच होणार
“आम्ही खूप साऱ्या तज्ञांशी यासंबंधी बोलत आहोत. सध्या तरी परीक्षेची जी तारीख दिली आहे त्या वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार आणि ऑफलाइन पद्धतीने होणार कारण ही बोर्डाची परीक्षा आहे. आम्ही ऑगस्टमध्ये अभ्यासक्रम कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरपासून पेपर पॅटर्न, त्याची तपासणी कशी करायची हे ठरतं. आम्हाला गाव खेड्यापर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी किमान दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना प्रक्रियेसाठी बोर्डाने किमान दीड ते दोन महिने लागतात. मागील वर्षात मुलांचं जे नुकसान झालं आहे त्याचा विचार करावा लागेल,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे.

आठवी, नववीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल
“पुढील अभ्यासक्रमासाठी या मुलांचा पाया मजबूत होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे या मुलांचं शिक्षण सुरु राहू दे. सध्या ऑनलाइन पद्धतीनं शिक्षण सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिथे रुग्ण वाढले आहेत तिथे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पण जर नववीचा विद्यार्थी शेवटपर्यंत शिकला नाही तर दहावीसाठी कसा तयार होईल? किंवा अकरावीचा विद्यार्थी शिकला नाही तर बारावीची बोर्डाची परीक्षा कसा देईल? त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून सुरु राहावं यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परीक्षेसंबंधी लवकरच निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे.

कधी होणार आहेत परीक्षा
काही दिवसांपूर्वीच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरून दहावी व बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची बोर्ड परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. तर बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान होणार आहे. या परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असून सकाळी १०.३० ते दुपारी १.३० व दुपारी ३ ते सायंकाळी ६ या दोन वेळांमध्ये घेतल्या जाणार आहेत.