राज्यात महाआघाडीचं सरकार येणार, खडसेंचे खळबळजनक वक्तव्य

रावेर (जळगाव) : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची भाजपने समजूत काढत त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर रावेर येथे प्रचाराचा नारळ फोडताना राज्यात महाआघाडीचेच सरकार येणार असल्याचे वक्तव्य खडसेंनी केले. त्यांच्या वक्तव्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. आपली चूक लक्षात येताच त्यांनी सावरत आमच्याकडे ते नाथाभाऊंला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरु आहेत ना, त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आले.
आपली चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी सावरत राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

पुढे बोलताना खडसे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र, नाथाभाऊ भाजपामध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊको गिराओ… म्हणून आघाड्या बिघाड्या सुरु आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

मिल गया तो मिल गया, नही तो छोड दिया, तीर लगा तो ठीक है, नही तो कमान अपने पास है, असा विरोधकांचा समाचार घेत, सर्व समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी आपण लढा देत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोणा एका समाजाच्या नेतृत्वासाठी आपण लढा देत नसल्याची कोपरखळी त्यांनी लगावली. दीनदुबळ्यांसाठी पोटच्या मुलासारखी आम्ही सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला आपल्याकडे हक्काचे मतदान मागण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले.

Visit : Policenama.com