महाशिवआघाडी ‘नैतिक’ नाही, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सत्ता स्थापनेचा प्रश्न लांबणीवर गेला आहे. अशामध्ये शिवसेनेला सोबत घेऊन काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेस सत्ता स्थापनेच्या प्रयत्नात असल्याचे चित्र दिसत आहे. यांच्या विरोधात हिंदू महासभेचे प्रमोद जोशी यांनी आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये शिवसेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसची ही आघाडी नैतिकतेला धरून नसल्याचा दावा देखील या याचिकेमध्ये करण्यात आला आहे.

प्रमोद जोशी यांनी असा दावा केला आहे की, महाराष्ट्रामध्ये भाजप व शिवसेना यांनी निवडणूकपुर्व युती केली होती. दोन्ही पक्ष हिंदूत्ववादी आहे आणि हिंदूत्वाच्या आधारावर या दोन्ही पक्षांनी मते मागितली. निकालानंतर दोन्ही पक्षांना महाराष्ट्रातील जनतेने स्पष्ट कौल दिला. या युतीला बहुमत मिळाले मग त्यांनी या जनमताचा सन्मान राखणे व सत्ता स्थापन करणे त्याचबरोबर जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पाऊले उचलायला हवी होती. मात्र, असे न करता शिवसेना फक्त सत्ता मिळविण्यासाठी दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करते हा प्रकार म्हणजे शिवसेनेने जनतेशी केलेला विश्वासघात आहे. हिंदुत्ववाद न मानणाऱ्या पक्षांशी शिवसेना युती करत आहे. ही भूमिका नैतिकतेला धरून नाही. त्यामुळे या पक्षाच्या आघाडीच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्याचे जोशींनी सांगितले.

भाजपने बिहार व जम्मू-काश्मीरमध्ये या प्रकारे सत्ता स्थापन केल्याचे निर्देशनास आणून दिल्यानंतर जोशी म्हणाले की, शिवसेना आणि भाजपने हिंदुत्वाच्या नावावर मते मागितली होती. या राज्यांमध्ये आधी या दोघांची युती नव्हती. बिहारमध्ये भाजपाने संयुक्त जनता दलासोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. मात्र, जनतेने भाजपाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलासोबतची आघाडी संपुष्टात आणून भाजपासोबत जाण्याचे ठरविले. तर जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पीडीसोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यानंतर भाजपाने सत्तेतून बाहेर पडण्याचे ठरविले त्यामुळे राज्यातील सरकार कोसळले.

Visit : Policenama.com