भाजपाच्या आशिष शेलारांचा उध्दव ठाकरेंवर ‘घणाघात’, म्हणाले…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – मुख्यमंत्रीपदावरून भाजपशी बिनसलेल्या शिवसेनेने आघाडीबरोबर सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु असून आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपने पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

या पत्रकार परिषदेत शिवसेनेला टोला मारताना अशिष शेलार म्हणाले कि, मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद निर्माण करणारे एकपात्री वगनाट्य आम्ही दररोज सकाळी पाहत आहोत. त्याचबरोबर शिवसेनेचं मोदींवरील प्रेम स्वार्थी की निस्वार्थी? हे जनतेला माहित असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच संजय राऊत यांना अमित शहा आणि नरेंद्र मोदी समजण्यासाठी वेळ लागेल असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले.

तसेच संजय राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांनी म्हटले कि, त्यांच्या वयाबरोबर त्यांची परिपक्वताही वाढावी, असे म्हणत त्यांना टोमणा मारला. पूर्वी बाळासाहेबांच्या आदरापोटी नेते मातोश्रीवर जात असत, आता काही नेते स्वार्थासाठी हॉटेलमध्ये चर्चा करण्यासाठी जातात असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना देखील टोला मारला. तसेच आज भाजपची महत्वाची बैठक होणार असून यामध्ये महत्वपूर्ण निर्णय होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच 90 हजार बूथवर संघटनात्मक निवडणुका होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर टीका करताना नरेंद्र मोदी हे उत्तम व्यक्ती असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

Visit : Policenama.com