भाजपकडून शिवसेनेला 130 जागा ?

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी मारत जागावाटपाचे सूत्र निश्चित केले असून आमचं ठरलंय असे म्हणणारे भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील जागावाटपाची चर्चादेखील अंतिम टप्प्यात आली आहे. भाजप पक्षाने आपल्याकडे जास्त जागा घेत शिवसेनेकडून मित्रपक्षांना द्यावयाच्या ९ जागा धरून त्यांना जवळपास १३० जागा सोडण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना पक्ष मात्र हा आपला हा आकडा आणखी वाढावा यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाशी संपर्क साधत असल्याचे समजले आहे. त्याचवेळी, आज भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल होणार आहेत. ते युतीबाबतचा अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहेत.

भाजप-सेनेतील जागावाटपासाठी गेल्या आठवडाभरापासून जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाल्यानंतर तेही मुंबईमध्ये तळ ठोकून असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे कळते. शिवसेनेला १४४ जागा देण्याविषयी दिल्लीतील भाजपचे नेतृत्व अनुकूल नाही. त्यांना ११५च्या आसपास जागा दिल्या जाव्यात असे मत दिल्लीतील भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या बैठकांमध्ये व्यक्त केले आहे. भाजप स्वबळावर लढल्यास त्यांच्या दीडशेच्या वर जागा निवडून येऊ शकतात असे सर्वेक्षण असल्याने प्रसंगी भाजपने स्वबळावर लढावे असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र युती व्हावी यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस आग्रही असून त्यासाठी शिवसेनेला जागा वाढवून देण्याबाबत ते देखील केंद्रातील नेत्यांशी सातत्याने संपर्कात असल्याचे कळते. शनिवारी देखील राज्यातील शिवसेना भाजप नेतृत्वामध्ये युतीबाबत चर्चा झाल्याचे कळते. रात्री उशिरादेखील या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचे कळते.

भाजप स्वतःकडे सुमारे १५८ ते १६० जागा ठेवत शिवसेनेला आपल्या सोबत ठेवण्यासाठी ११५ नव्हे, तर सुमारे १३० जागा देण्यासंदर्भात गांभीर्याने विचार केला आहे. शिवसेनेला देण्यात येणाऱ्या १३० जागांमध्ये मित्रपक्षांसाठी दोन्ही पक्षांनी सोडावयाच्या १८ जागांपैकी ९ जागांचा समावेश होणार असल्याची महिती मिळाली आहे. शिवसेना मात्र १४४ जागांसाठी प्रयत्नशील आहे. १४४ जागांपैकी ९ जागा आम्ही मित्रपक्षांसाठी सोडू, मात्र त्यापेक्षा आणखी कमी जागा सोडणे आम्हाला जमणार नसल्याने, शिवसेनेच्या जेष्ठ नेत्याचे म्हणणे आहे.

नेत्याने पुढे सांगितले कि, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः दिल्लीत पक्षासाठी भाजप नेतृत्वाच्या संपर्कात आहेत त्यामुळे ते चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी रविवारी जागावाटपा संदर्भात बोलून दाखवला. दरम्यान, अमित शहा रविवारी मुंबईत असल्याने जागावाटपाची चर्चा, रविवारी सायंकाळपर्यंत युतीचा अंतिम निर्णय अपेक्षित आहे. युतीच्या जागवाटपांवर लवकरच शिक्का मोर्तब होणार आहे.

त्यासाठी एकीकडे भाजपने स्वतः १५८ तर शिवसेना १३० जागांवर लढणार असल्याचे समजले आहे. तर दूसरीकडे शिवसेनेचे दोन्ही पक्षांना समान म्हणजे १४४ – १४४ जागा करण्याचे गणित आहे.

Visit :- policenama.com