कौतुकास्पद ! महाराष्ट्रातील ‘या’ गावात 45 वर्षांवरील सर्वांचे झाले लसीकरण

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा जास्त आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यानुसार, लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. त्यातच अमरावतीतील मेळघाटमधील चिंचखेड गाव हे चर्चेत आहे. कारण तिथं 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

चिंचखेड गाव हे गाव आदिवासी भागात आहे. लसीकरण सुरु झाल्यानंतरच्या सुरुवातीला लसीबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. मात्र, ग्रामस्थांची जनजागृती आणि आरोग्य कर्मचार्‍यांसह प्रशासनाने पसरवलेल्या जनजागृतीचा ग्रामस्थांवर परिणाम झाला आणि ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता ही लस घेण्यास सुरू केले. या खेडे गावातील लोकसंख्या 604 आहे. त्यापैकी 136 लोकं 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. त्यांचे लसीकरण झाले. या सर्वांनी देशासमोर एक नवीन उदाहरण मांडले आहे.

दरम्यान, देशात सध्या लसींचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या तुटवड्यामुळे गावात 18 ते 44 वर्षे वय असणाऱ्या नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. लसीकरण सुरू होताच गावकरी त्यात भाग घेतील आणि 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकं उत्साहाने लसीकरण करतील. चिंचखेड गाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे.