पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारला सवाल, म्हणाले – ‘लसीकरणासाठी 35 हजार कोटीची तरतूद, तरीही सामान्यांकडून पैसे का घेता ?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने 1.65 कोटी लसीचे डोस खरेदी केले होते. लोकसभेत दिलेल्या एका उत्तरानुसार प्रत्येक डोसची किंमत 210 रुपये होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणानुसार लसीकरण मोहिमेसाठी 35 हजार कोटी राखून ठेवले आहेत. एवढ्या रकमेमध्ये दीड अब्जाहून अधिक डोस विकत घेता येतील आणि 75 कोटी लोकसंख्येचे लसीकरण करता येईल. म्हणजेच भारतातील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण अर्थसंकल्पीय तरतुदीतून करता येणे शक्य आहे, मात्र असे असताना केंद्र सरकार सर्वसामान्यांकडून शुल्क का घेत आहे ? असा सवाल कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सोमवार (दि. 1) पासून प्रारंभ झाला आहे. 60 वर्षांवरील व्यक्ती किंवा 45 वर्षांवरील ज्या व्यक्तींना गंभीर आजार आहेत. त्यांना या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात नागरिकांकडून पैसे आकारण्याच्या सरकारच्या निर्णयावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दुर्दैवाने 35 हजार कोटींची अर्थसंकल्पीय घोषणा आणि भारत लसीचा सर्वात मोठा पुरवठादार असूनही मोदी सरकार सर्वसामान्यांच्या खिशात हात घालत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे. तसेच अमेरिका, इंग्लंड किंवा कॅनडासारख्या मोठ्या देशांमध्ये सर्व नागरिकांना मोफत लस देण्यात येत आहे. यासाठी त्या देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या विमा योजनांचा किंवा किंवा अर्थसंकल्पीय तरतुदीचा आधार घेतला जात आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना मोफत कोविड प्रतिबंधक लस दयावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.