Unlock 4 : राज्यातून आज E-Pass हद्दपार होणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वाढत्या कोरोनाच्या संक्रमणामुळे महाराष्ट्र राज्यातही लॉकडाऊन लावण्यात आले आहे. तसेच त्यानंतर अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र, आता केंद्र सरकारने अनलॉक 4 ची नियमावली जाहीर केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही अनलॉक 4 ची नियामवली जाहीर करण्यात येणार आहे. यात राज्य सरकार ई-पास रद्द करणार असल्याच्या विचारात आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

लॉकडाऊननंतर सध्या राज्यात प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. या ई-पास प्रणालीवर मागील काही दिवसांपासून टीका होत आहे. तर ई-पास चालू ठेवणे म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन असेल, असेही केंद्राने बजावले आहे. केंद्र सरकारने नुकतेच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही, असे सांगितले आहे. पण, याअगोदर ई-पास इतिहासजमा करणारे कर्नाटक हे पहिले राज्य ठरले होतं. केंद्र सरकारने यापूर्वीच नियमावली जाहीर करत ई-पास प्रणाली बंद करण्याचे निर्देश राज्यांना दिलेत. याशिवाय कंटेन्मेंट झोन वगळता स्थानिक स्तरावर कुठेही वेगळे निर्बंध जारी करणे म्हणजे केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन असेल, असेही सांगितले आहे.

सोमवारी ई-पास संदर्भात नियम जाहीर करत आहे. केंद्र सरकारने राज्यांना मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास सांगितले आहे, असे एका अधिकार्‍याने सांगितले आहे. दरम्यान, मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल सुरू करण्याबाबत अजून कोणतीही चर्चा झालेली नाही, असेही या अधिकार्‍याने सांगितले आहे. यावर राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार आहे, असेही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आर ए राजीव यांनी सांगितले आहे. सेवा सुरू करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत, असेही ट्वीट काही दिवसांपूर्वी मुंबई मेट्रोने केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सद्यपरिस्थितीत लोकल ट्रेन आणि मेट्रो सेवा सुरू करण्याच्या विरोधात आहेत, असे बोललं जातंय. तर मुख्य सचिव संजय कुमार आणि इतर अधिकार्‍यांनी लोकल ट्रेनची संख्या वाढवण्याची मागणी केलीय. दुसरीकडे भाजप देखील मंदिरे उघडण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकत आहे.