महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ८० टक्के भूमिपुत्रांना रोजगारात संधी मिळावी यासाठी ठाकरे सरकार लवकरच Maha Jobs पोर्टल लॉन्च करणार आहे. एमआयडीसीकडे या पोर्टलची जबाबदारी वर्ग करण्यात आली असून, या माध्यमातून कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. स्थानिकांना रोजगार देण्यासाठी एमआयडीसीने ९५० व्यापार आणि १७ निरनिराळी क्षेत्र निवडली आहेत. इंडस्ट्री युनिट आणि नोकरीची गरज असणारे दोघे सुद्धा या पोर्टलवर आपली नोंदणी करु शकतील. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

“राज्यात लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर ६५ हजार इंडस्ट्रीयल युनिट्स सुरु झाले. त्या अनुषंगाने एमआयडीसीकडून अलीकडेच एक मानव संसाधन सर्वेक्षण करण्यात आलं. त्यातून जवळपास ३३० युनिट्सकडून कडून आम्हाला प्रतिसाद मिळाला. त्यांना जवळपास ५० हजार कर्मचाऱ्यांची गरज असल्याचा अंदाज आहे. यापैकी ७० टक्के कुशल तर ३० टक्के अकुशल आहेत.” अशी माहिती उद्योग विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिली.

तसेच “एमआयडीसीमध्ये स्थिती असणारे इंडस्ट्रीयल युनिट आणि बाहेर असणारेही या पोर्टलवरती भरतीसाठी नोंदणी करु शकतात. १७ क्षेत्रांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये ऑटोमोबाईल, अभियांत्रिकी, उत्पादन, लॉजिस्टिक, वस्त्रोद्योग, वस्त्र, प्रक्रिया, औषधनिर्माण आणि जैव तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

“हे पोर्टल सर्वांसाठी एक मंच उपलब्ध करुन देईल. कंपनी तसेच ज्यांना नोकरीची गरज आहे ते दोघेही येथे नोंदणी करु शकतील. कुशल, अर्धकुशल आणि अकुशल सर्वांसाठी ही संधी उपलब्ध आहे,” असं अधिकारी म्हणाले. काही दिवसांपूर्वी १६ हजार कोटींचे सामंजस्य करार करताना कंपन्या ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना देतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती.