RSS ची शिवसेनेवर टीकेची ‘झोड’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद म्हणजे काय ते आता समजले असेल. पक्ष सांभाळणे एक आणि मुख्यमंत्री पद सांभाळणे वेगळे. मुख्यमंत्री पदाची मागणी करणे सोपे असते मात्र ते टिकवून ठेवणे खूप अवघड जाते. पक्षाबाबत आपण हवे ते निर्णय घेऊ शकतो मात्र विधासभेत हवे ते निर्णय घेता येत नाहीत तेव्हा नियमांचे आणि संविधानाचे पालन करणे गरजेचे असते. त्यावेळे नियम धाब्यावर बसवता येत नाहीत. याचा अनुभव आता उद्धव ठाकरे घेत असतील अशा प्रकारची टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर संघाचे मुखपत्र असलेल्या तरुण भारतामधून करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांना आपला मुलगा आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करायचे होते परंतु ते कमी अनुभवी असल्याने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ते मान्य झाले नसते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाबाबत मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या तयार नव्हते अशा प्रकारची टीका तरुण भारत म्हणून करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून निवडले होते. मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेतले नेते न दिसत केवळ आदित्य ठाकरे दिसत होते अशा शब्दात तरुण भारत मधून उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाबाबत भाष्य करण्यात आले आहे.

नेमकं काय म्हणलय तरुण भारताच्या अग्रलेखात
आपल्या किचन कॅबिनेटच्या सल्ल्याने उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवले तर ते स्वत: अडचणीत येतील, पण राज्याला तसेच राज्यातील जनतेलाही अडचणीत आणतील. कारण, त्यांच्यासमोर देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा आक्रमक तसेच अभ्यासू विरोधी पक्षनेता आहे, याची जाणीव उद्धव ठाकरे यांनी ठेवली पाहिजे, त्यातच त्यांचे भले आहे. विधानसभेत बहुमत सिद्ध करताना याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यामुळे पंचतारांकित हॉटेलातील कैदेतून आता शिवसेनेच्या आमदारांची सुटका होऊ शकते. मात्र, ज्या घाईगर्दीने उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले, त्यामुळे आपल्या सरकारच्या पाठीमागे बहुमत आहे की नाही, याबाबत त्यांनाच पुरेशी खात्री नसावी, असे दिसते.

देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेले सर्व आक्षेप दिलीप वळसे पाटील यांनी फेटाळून लावले असले, तरी त्यात तथ्य नव्हतेच, असे म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी ज्या पद्धतीने शपथ घेतली, त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे.

एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवण्याचा शब्द मी बाळासाहेब ठाकरे यांना दिला, असे उद्धव ठाकरे आधी वारंवार म्हणत होते. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम आणि दिवाकर रावते यांच्यापैकी एकाला मुख्यमंत्री केले असते, तर शिवसैनिकाला मुख्यमंत्री करून दाखवल्याबद्दल स्वर्गात बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यालाही समाधान लाभले असते. पण उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक ते स्वत:च होते, हे आता दिसून आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले. अपेक्षेप्रमाणे बहुमत सिद्ध केल्यामुळे उद्धव ठाकरे सरकारचे घोडे गंगेत न्हाले. पण त्यांच्या सरकारचा पुढील प्रवास सोपा नाही, याचा अनुभव ताज्या घटनाक्रमाने आला आहे.

शपथ ही विहित नमुन्यातच घ्यावी लागते. त्यात फेरफार करता येत नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यासोबत शपथ घेणार्‍या मंत्र्यांनी आपल्या निष्ठांचे जे ओंगळवाणे प्रदर्शन केले, ते लोकशाहीला न शोभणारे तसेच चीड आणणारे होते. या मुद्यावर राज्यपालांकडे धाव घेण्यासोबत न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत आले, त्यामुळे विधिमंडळाचे नियम तसेच प्रथा आणि परंपरा यांची त्यांना माहिती नसावी, हे एकवेळ समजू शकते. पण उद्धव ठाकरे सोडून शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, रामदास कदम आणि दिवाकर रावते आदी नेते तर कित्येक वर्षांपासून विधिमंडळाचे सदस्य आहेत.
त्यांना तर सर्व नियमांची चांगली माहिती आहे, मग त्यांनी उद्धव ठाकरे यांना याबाबत सतर्क का केले नाही, असा प्रश्न पडतो.

कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली नव्या सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध केले असते, तर फारसे बिघडले नसते. मात्र, दिलीप वळसे पाटील यांची काळजीवाहू अध्यक्ष म्हणून निवड करत नव्या सरकारने एकप्रकारे जुन्या काळजीवाहू अध्यक्षांवर अविश्वास दाखवला, असे म्हणावे लागेल.

राज्यपालांनी नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी 3 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यामुळे 3 डिसेंबरपर्यंत नव्या सरकारने बहुमत सिद्ध केले असते तरी फारसे बिघडले नसते. पण शनिवारीच विधानसभेचे तातडीचे अधिवेशन बोलावून उद्धव ठाकरे यांनी बहुमत सिद्ध करून दाखवले. ही यांची घाई संशयाला जागा निर्माण करणारी आहे.

Visit : policenama.com