राज्यपालांची अध्यादेशावर स्वाक्षरी, आता राज्यातील 12668 ग्रामपंचायतींवर प्रशासक !

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – एप्रिल, मे आणि जूनमध्ये 1 हजार 566 ग्रामपंचायती आणि जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान प्रस्तावित असलेल्या 12 हजार 668 ग्रामपंतायतींवर प्रशासक नियुक्तीच्या अध्यादेशावर राज्यापालांनी गुरुवारी (दि.25) स्वाक्षरी केली आहे. पुढील आठवड्यात याबाबत अध्यादेश जारी केला जाणार आहे. मुदत संपलेल्या व कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता होऊ न शकणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता.
ग्रामपंचायत कायद्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी अध्यादेश काढण्यास मंत्री मंडळाने मन्याता दिली आहे. निवडणुका पुढे ढकलण्याचा अध्यादेश राज्यपालांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला होता. एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचार सभा मेळावे आदींचे आयोजन करण्यात येते. परंतु राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या ग्रमपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला पत्र
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार, कोणत्याही कारणामुळे (नैसर्गिक आपत्ती, आणीबाणी, युद्ध, वित्तीय आणिबाणी किंवा प्रशसासकीय अडचणी) मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबाबत निवडणूक आयोगाच्या घोषित कार्यक्रमानुसार निवडणूक घेता आली नाही तर शासनास त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीचा अधिकार देण्यात आला आहे. जुलै ते डिसेंबर 2020 दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची कार्यवाही थांबवावी. तसेच ज्या ग्रामपंचायतींची 5 वर्षांची मुदत संपेल, तिथे विद्यमान कार्यकारिणी पुढे तशीच चालू न ठेवता, त्या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करावी असे आयोगाने स्पष्ट केले होते. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेऊन व आवश्यकतेनुसार राज्य शासनासोबत सल्लामसलत करून निवडणूक स्थगिती उठवण्याबाबत व निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयोगाने राज्य सरकारला कळवले होते.

प्रशासक नियुक्तीचा पुढील आठवड्यात शासन निर्णय
राज्यातील एप्रिल, मे आणि जून महिन्यात 1 हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तर जुलै ते डिसेंबर 2020 या कालावधीत 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार मुदत संपलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे अशक्य आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार प्रशासक नियुक्तीचा अध्यादेश राज्यपालांकडे पाठवण्यात आला होता. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असून पुढील आठवड्यात प्रशासक नियुक्तीचा शासन निर्णय जारी करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी दिली.