मुंबईकरांना दिलासा ! आजपासून ‘या’ गोष्टी होणार सुरू

पोलिसनामा ऑनलाईन – ‘मिशन बिगिन अगेन’ धोरणानुसार आजपासून महाराष्ट्रात अनलॉकडाउन एकला सुरुवात होत आहे. मागच्या दोन महिन्यांपासून कठोर निर्बंध असलेल्या मुंबईत आजपासून काही गोष्टी सुरु होणार आहेत. बाजारपेठा, दुकाने सुरु असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, पुर्वीसारखी गर्दी करता येणार नाही.

मुंबई शहर आणि शेजारच्या महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत प्रवासासाठी परवानगीची अट काढून घेण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईँदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ येथे नागरिकांना आता विनापरवानगी प्रवास करता येणार आहे. त्याशिवाय पहाटे पाच ते रात्री सात या वेळेत नागरिकांसाठी उद्याने, मैदाने खुली करण्यात आली आहेत. यावेळेत नागरिक व्यायाम, जॉगिंग, सायकल चालवू शकतात. मात्र यावेळी व्यायामाचं कोणतंही साहित्य, गार्डनमधील जीम, ओपन एअर जीम वापरता येणार नाही. दुकाने सम-विषम नियमाने पूर्ण दिवस सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. एका दिवशी रस्त्याच्या एकाच बाजूची दुकाने सुरु राहतील. नियमांचे पालन होईल यासाठी पोलीस आणि महापालिका आयुक्तांनी मार्केट दुकाने मालक असोसिएशनला चर्चेत सहभागी करुन घ्यावे. यावेळी वाहतूक व्यवस्था आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन महत्त्वाचे असणार आहे. कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून करोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नाकारण्यात आली आहे.