राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त ग्रामपंचायतीमध्ये ‘कमळ’ फुलणार, भाजपाच्या ‘या’ नेत्याचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल हाती येत असतानाच, सुरुवातीच्या निकालाच्या कलांमध्ये राज्यात शिवसेना आणि भाजपामध्ये कडवी टक्कर दिसून येत आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपली सत्ता कायम ठेवताना दिसत आहे., ग्रामपंचायत निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती येण्यात बराच वेळ लागण्याची शक्यता असताना भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्यातील ग्रामपंचायत निकालांबाबत मोठे विधान केले आहे.

केशव उपाध्ये म्हणाले की, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता जी आकडेवारी समोर येते. काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे त्यामध्ये भाजपा चांगली कामगिरी करत असून, १४ हजारांपैकी सुमारे सहा हजार ग्रामपंचायतींवर भाजपाला यश मिळेल, संध्याकाळपर्यंत हा आकडा वाढेल, असे ते म्हणाले. तसेच या निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने साम-दाम-दंड-भेद या सर्वांचा वापर केला आहे.असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला.

यावेळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील निकालांचा केशव उपाध्ये यांनी आवर्जुन उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला मानले जाते. मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला चांगले मतदान झालेले दिसत आहे. उदाहरणच द्यायचं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. अगदी शिवसेनेच्या खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्येही भाजपाने विजय मिळवला आहे, देवगड, वैभववाडी, मालवण आदी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाचा विजय झाला आहे, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली. परंतु भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधील गावात झालेल्या भाजपाच्या पराभवाबाबत विचारले असता उपाध्ये यांनी त्यावर काही न बोलता, चंद्रकांत पाटील हे राज्याचे नेते आहेत. त्यांना संपूर्ण राज्याकडे लक्ष द्यावे लागते, असे ते म्हणाले.