काय सांगता ! होय, महाराष्ट्रात तब्बल 56 हजार जण कोट्याधीश तर उत्तर प्रदेश दुसर्‍या क्रमांकावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी देशातील श्रीमंताची यादी प्रसिध्द करणार्‍या हुरुन इंडियाने यंदाही नवमध्यम वर्गीयासंबंधी एक अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार देशात 4.12 लाख कोट्याधीश असून सर्वाधिक 56 हजार कोट्याधीश महाराष्ट्रात असल्याचे म्हटले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेश असून येथे 36 हजार, तर तिसर्‍या क्रमांकावर तामिळनाडू असून येथे 35 हजार कोट्याधीश असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

अहवालानुसार, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात या पाच राज्यांत देशातील एकूण 46 टक्के कोट्याधीश राहतात. कर्नाटकात जवळपास 33 हजार कोट्याधीश तर गुजरातमध्ये 29 हजार, पश्चिम बंगालमध्ये 24 हजार तर राजस्थानमध्ये 21 हजार आणि आंध्रमध्ये 20 हजार कोट्यधीशांची संख्या आहे. महाराष्ट्राचा विचार करता भारताच्या जीडीपीच्या 16 टक्के जीडीपी एकट्या महाराष्ट्रातून येतो. त्यामुळे देशाच्या आर्थिक घडामोडीत राज्याचे महत्व हे अव्वल आहे. काही दिवसापूर्वी हुरुन इंडियाने देशातील श्रीमंतांची यादी प्रसिध्द केली होती. त्यात जवळपास 83 अब्ज डॉलर इतकी संपत्ती असलेले रिलायन्सचे मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. गेल्या वेळी जागतिक श्रीमंतांच्या यादीत 11 व्या स्थानी असलेले मुकेश अंबानी हे आता 8 व्या स्थानी पोहचले आहेत. कोरोना काळात त्यांच्या संपत्तीत 24 टक्क्यांची वाढ झाली आहे.