देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे कमी ! शिक्षेच्या प्रमाणातही वाढ, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आकडेवारी

मुंबई : हाथरस प्रकरणानंतर राज्यातील भाजपा समर्थकांनी महाराष्ट्रात बलात्कार आणि इतर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचा कांगावा करत उत्तर प्रदेशातील सरकारची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला होता. यावर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आकडेवारी देत, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे कमी असून शिक्षेच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे म्हटले आहे.

हा दावा करताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा दर 2018-19 च्या तुलनेत तेवढाच आहे. महाराष्ट्र याबाबतीत आठव्या क्रमांकावर असून महाराष्ट्राच्यापेक्षा केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांत गुन्हे दर अधिक आहे.

शिक्षा होणाचा दर 49 टक्के
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी म्हटले की, राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे तसेच शिक्षेचे प्रमाण वाढले आहे. 2018 मध्ये हा दर 41.41 होता तो 2019 मध्ये 49 टक्के झाला आहे. त्यामध्ये राज्य अकराव्या क्रमांकावर आहे. कर्नाटक (36.6), मध्य प्रदेश (47), गुजरात (45.6), तेलंगणा (42.5) असे प्रमाण आहे.

खूनांसदर्भातील गुन्ह्यात राज्य 7 व्या क्रमांकावर
2019 मध्ये खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये देशाचा गुन्हे दर 2.2 होता. यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हे दर फक्त 1.7 असून राज्य 25 व्या क्रमांकावर होते. तसेच खुनाचा प्रयत्न या प्रकारातील गुन्ह्यांत महाराष्ट्राचा 17 वा क्रमांक आहे. देशात 2019 मध्ये अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा 9 वा क्रमांक आहे. राज्यात केवळ 910 गुन्ह्यांची नोंद आहे. उत्तर प्रदेश (25,524), मध्य प्रदेश (3,847), बिहार (2,976), राजस्थान (2,095) गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

बलात्कारप्रकरणांत राजस्थान, युपी, गुजरात पुढे
2019 मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये 5,997, उत्तर प्रदेशमध्ये 3,065, मध्य प्रदेशमध्ये 2,485 आणि महाराष्ट्रात 2,299 असे गुन्हे नोंदले गेले. त्यापैकी 2,274 गुन्हेगार हे पीडितांचे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी आहेत; तर केवळ 25 जण अनोळखी आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हे दर 3.09 असून महाराष्ट्र 22 व्या नंबरवर आहे. इतर राज्यांचा गुन्हे दर केरळ (11.6), हिमाचल प्रदेश (10), हरयाणा (10.9), झारखंड (7.7) व मध्य प्रदेश (6.2) आहे.