… म्हणून आपण शेवटचा पर्याय म्हणून Lockdown चा विचार करतोय; आरोग्यमंत्र्याचे स्पष्टीकरण

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या दिशेने हालचाली सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना संसर्गाचे मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून कोरोनाशी लढू या, असे सांगत, राज्यांनी लॉकडाऊन टाळावेत, तो शेवटचा पर्याय असावा असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. आज राज्यात दररोज रुग्णसंख्या 70 हजारांच्या वर जात आहे. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून नक्कीच आपल्याला लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय, असे टोपे यांनी म्हटले आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यावर भाष्य केले आहे. ब्रेक द चेन अंतर्गत घातलेल्या निर्बंधांत आणखी निर्बंध वाढवले जातील आणि ती आजच्या काळाची गरज असल्याचेही टोपे म्हणाले. दरम्यान ब्रिटनमध्ये कालच्या तारखेत केवळ 2 जणांचा मृत्यू झाला आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी 3 महिने लॉकडाऊन केला होता. देशातील 60 टक्के लोकांचे लसीकरण करून घेतल्याचे उदाहरण मी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दिले. हर्ड इम्युनिटी त्यांच्यात आल्याने मृत्यूचं प्रमाणही नगण्य आहे. आपल्यालाही तिच स्ट्रॅटजी अवलंबावी लागेल. पुढील15 दिवसांत कडक लॉकडाऊन करायचा आणि मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे असे ते म्हणाले. 18 ते 45 वयोगटातील नागरिकांसाठी केंद्राने लसीकरणाची जी जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवली आहे. ते देखील आव्हान आपण स्वीकारू. देशात किंवा देशाच्या बाहेर जिथून मिळेल तिथून लस घेऊन आपण लसीकरण करू. त्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे टोपे म्हणाले.