राज्यातील Lockdown बाबत आरोग्यमंत्र्यांचे मोठं विधान; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तर आता पुन्हा एकदा राज्यात लॉकडाऊनच्या हालचाली सुरु आहेत. त्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मोठं विधान केले आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यावर राजेश टोपे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘जगभरात आपण पाहिले तर 15 दिवस ते तीन आठवड्यांचा लॉकडाऊन हा गरजेचा असून, त्याचे कडक पालन झाले पाहिजे. त्यानंतर त्या कालावधीचा फायदा होतो. कोरोनाची साखळी तोडणे हा लॉकडाऊनचा मुख्य हेतू असतो. परिस्थितीत सुधारणा होणे गरजेचे आहे. आपण लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल करत आहोत. पण तो करावा लागू नये, अशी अपेक्षा आहे’.

तसेच जेव्हा रुग्णालयांमध्ये गर्दी होऊ लागते, औषधांचा तुटवडा निर्माण होतो, डॉक्टरांची कमतरता जाणवू लागते आणि दैनंदिन रुग्णसंख्येचा सामना करण्यास आपण सक्षम नसतो तेव्हा तात्काळ लॉकडाऊन जाहीर करणे हा नियम आहे. जेणेकरुन आपण सुविधा निर्माण करुन परिस्थितीचा सामना करु शकतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन लावण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता आरोग्यमंत्री टोपे यांनी लॉकडाऊन हा गरजेचा असून, त्याचे कडक पालन झाले पाहिजे, असे म्हटले आहे.