Lockdown बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठ विधान, म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन – राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकट निर्माण झाल्याने लॉकडाउनबाबत चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाउन करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाउनसंबंधी महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की, लॉकडाऊन जाहीर करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचा असतो. त्यामुळे राज्याच्या आरोग्याच्या हिताचा तसेच इतर परिणामांचा विचार करुन ते आणि इतर वरिष्ठ मंडळी चर्चा करूनच निर्णय घेतील. लॉकडाउन हा खरे तर शेवटचाच पर्याय असल्याने त्यावर सविस्तर चर्चा करुनच निर्णय घेऊ, असे टोेपे यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. मुंबई लोकलबाबत कठोर निर्णय घेण्याचा ईशाराही टोपे यांनी दिला आहे. ते म्हणाले की, सुरेश काकाणी यांनी चर्चा करुन पत्र काढले आहे. ज्यात त्यांनी लोकांनी योग्य प्रतिसाद दिला नाही तर रेल्वेच्या बाबतीत योग्य ते विचार करावा लागेल असे सांगतिले आहे. त्यामुळे मुंबई पालिका आयुक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले. यापूर्वी टोपे यांनी राज्यातील काही शहरांमध्ये वाढत असलेली रुग्णसंख्या पाहता लॉकडाउन लावणे अटळ असेल तर त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले होते. राज्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपायांचे गांभीर्याने पालन करावे, अन्यथा लॉकडाउनचा निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे म्हटले होते. आणखी दोन ते तीन दिवस पुण्यासह राज्यातील इतर प्रमुख शहरांतील रुग्णवाढीची दिशा पाहून योग्य ते निर्णय घेतले जातील, असे ते म्हणाले.