अजित पवारांबाबतची भूमिका न्यायालयात स्पष्ट करू : फडणवीस

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईतील न्यायालयात पवारांच्या समावेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. नागपूर खंडपीठातील प्रकरणात त्यासंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र दाखल करून भूमिका स्पष्ट करण्यात येईल. याशिवाय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर सरकारचा भर असून विद्यमान युती सरकारचा कार्यकाळ संपेपर्यंत अधिकाधिक प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सिंचन घोटाळयात अजित पवारांचा समावेश आहे किंवा नाही, अशी विचारणा नागपूर खंडपीठाने केली आहे. यासंदर्भात नागपुरात आयोजित दिवाळी मिलन समारंभात विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले, आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर युती करण्यास आम्ही तयार आहोत. त्यामुळेच युतीवरील प्रेम आम्ही वेळोवेळी प्रगट करत असतो. मात्र शिवसेनेचे भाजपवरील प्रेम लपून बसले आहे. परंतु काळजी करण्याची गरज नाही ते योग्य वेळी व्यक्त होईलच. युतीसाठी मातोश्रीवर बैठक आयोजित केली तरी आमची हरकत नाही.

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे हा प्रस्ताव युतीच्या काळात आला आणि तो केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यावेळी काही अडचणी आल्यामुळे त्यावर चर्चा झाली नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनापूर्वी व्हावा असा प्रयत्न राहणार आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमबरोबर युती केल्यामुळे त्याचा भाजपाला फायदा होईल असे काही नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.