अहिल्यानगर : पोलीसनामा ऑनलाईन – Maharashtra Kesari | महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ यांच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघ, आमदार संग्राम जगताप सोशल फाऊंडेशनच्या वतीने अहिल्यानगर येथील स्व. बलभीम अण्णा जगताप क्रीडा नगरीत २ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय दिला होता.
दरम्यान आता या निर्णयावरून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने त्यांच्यावर ३ वर्षांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली असून त्यांना राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिलेल्या वादग्रस्त निर्णयाबाबत एक समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले.
अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीमध्ये पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे यांच्या कुस्तीस मुख्य पंच म्हणुन काबलिये काम करत होते. यावेळी कुस्ती पंच नितीश काबलिये यांनी दिलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला. रागाच्या भरात शिवराज राक्षे ही आक्रमक झाला आणि त्याने थेट पंचांना मारहाण केली. यामुळे शिवराज राक्षे याला याअगोदरच ३ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.