राज्य सरकारनं केली ‘ब्रेक दि चेन’च्या आदेशात सुधारणा, आणखी काही आवश्यक सेवांचा केला समावेश; जाणून घ्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात दिवसेंदिवस वाढणा-या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार (दि. 5 ) पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी होणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेतली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर दिला आहे. रविवारी झालेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता. त्यात आणखी काही सेवांचा समावेश राज्य सरकारने केला असून त्या संदर्भातील आदेश आज प्रसिध्द करण्यात आला आहे.
Guidelines for containment & management of COVID-19 #BreakTheChain pic.twitter.com/jVISqUZVQL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 5, 2021
आता या सेवांचा देखील आवश्यक सेवामध्ये मोडणार
1) पेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने
2) सर्व प्रकारच्या कार्गो सेवा
3) डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा
4) शासकीय व खासगी सुरक्षा सेवा
5) फळविक्रेते
तसेच खालील खासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले पाहिजे. जोपर्यंत लसीकरण होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणा-यांकडून 1 हजाराचा दंड आकारला जाणार आहे.
या खासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:
1) रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स
2) सेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स
3) सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे
4) सर्व मायक्रो फायनान्स संस्था
5) कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर
6)सर्व वकिलांची कार्यालये.
7) एखाद्या व्यक्तीला रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बस, विमान यातून आगमन किंवा प्रस्थान करायचे असेल तर त्या व्यक्तीला अधिकृत तिकिट बाळगावे लागले. जेणेकरून त्याला संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करता येईल.
8 ) औद्योगिक कंपन्यातील कामगारांना ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये -जा करता येईल.
9) एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.
10) परीक्षार्थी विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.
11) घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेतला जाईल.
12) आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.