Lockdown in Maharashtra : सर्वांच्या मनाची तयारी झालीय, ‘एवढ्या’ दिवसांचा असू शकतो लॉकडाऊन, आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची माहिती

जालना : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणे हाच पर्याय असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी (दि.10) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सांगितले होते. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी दोन ते तीन दिवसांत मुख्यमंत्री लॉकडाऊनचा निर्णय घेणार आहेत. तसेच रेमडेसिवीरवर इंजेक्शनच्या नियंत्रणासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांना आता रेमडेसिवीर जिल्हाधिकारी कार्यालयातून घ्यावे लागणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही – मुख्यमंत्री
कोरोना साथीची साखळी तोडायची असेल तर राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याशिवाय पर्याय नाही, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वपक्षीय बैठकीत मांडले. कोरोनाची साखळी तोडण्याची गरज आहे. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. राज्यात लॉकडाऊनला पर्याय नाही. संसर्ग झालेला एक रुग्ण 25 जणांना बाधित करतो. त्यामुळे ही साखळी तोडणे आवश्यक आहे. मोठ्या प्रमाणात तरुण, लहान मुले बाधित होत आहेत.त्यामुळे एकमुखाने निर्णय घेण्याची वेळ आली आहे. यामध्ये राजकारण नको. केंद्राकडे ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.

15 एप्रिलनंतर परिस्थिती गंभीर होईल

राज्यात कडक लॉकडाऊनची गरज आहे. नाहीतर 15 एप्रिलनंतर स्थिती गंभीर होईल, असा इशारा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी बैठकीत दिला. सर्वांसमोर त्यांनी कोरोनासंबंधी सादरीकरण केले.