मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अहमदनगर लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बराच वाद झाला. ही जागा राष्ट्रवादीकडे असताना ती काँग्रेसला सोडण्यात यावी यासाठी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांनी बराच हट्ट केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला. शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे ही जागा काँग्रसेला सोडण्यात आली नाही, असा आरोप शरद पवार यांच्यावर करण्यात आला. यावर शरद पवारांनी भाष्य करत मोठा खुलासा केला आहे.
दक्षिण नगरची जागा ही वर्षानुवर्षे राष्ट्रवादीकडे आहे. या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत आमची ताकदही जास्त आहे. तसेच काँग्रेसच्याही स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर हेच जाणवत होत. पण हे कार्यकर्ते उघडपणे बोलू शकत नव्हते. कारण त्यांच्या नेत्यामुळे त्यांची अडचण होत होती. त्यामुळे तेथील परिस्थितीचा विचार करुन आम्ही ही जागा आमच्याकडेच ठेवण्याच निर्णय घेतला असल्याचा खुलासा शरद पवार यांनी खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
या लोकसभा मतदारसंघामध्ये सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संग्राम जगताप यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या मतदारसंघात होणार आहे. सुजय विखे यांनी भाजपचा झेंडा हाती घेत राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे.